Class 11 Marathi Yuvakbharati -Chapter -10- Shabda / शब्द

इयत्ता अकरावी मराठी युवकभारती  कविता १० वी - शब्द 



यशवंत मनोहर (१९४३):

कवी, समीक्षक., सकस जीवनानुभव आणि प्रत्ययकारी प्रतिमांनी समृद्ध अशी ओजस्वी शब्दकळा यांमुळे यशवंत मनोहर यांची कविता शोषणाचा तीव्र निषेध करते व उपरोधाचा आश्रय घेत प्रस्थापित समाजाच्या मूल्यव्यवस्थेवर घणाघाती प्रहार करते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून घेतलेल्या प्रेरणेतून आक्रमक शैलीने समाजवास्तवावर प्रखर भाष्य करणारे कवी, विचारवंत व समीक्षक म्हणून यशवंत मनोहर यांचे स्थान महत्त्वाचे आहे. 'उत्थानगुंफा', 'काव्यभीमायन', 'मूर्तिभंजन', जीवनायन', 'प्रतीक्षायन', 'अग्नीचा आदिबंध', 'स्वप्नसंहिता', 'युगमुद्रा', 'बाबासाहेब' इत्यादी कवितासंग्रह प्रसिद्ध. 'दलित साहित्य : सिद्धांत आणि स्वरूप', 'स्वाद आणि चिकित्सा', 'समाज आणि साहित्य समीक्षा', 'नवे साहित्यशास्त्र', 'परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये' इत्यादी समीक्षात्मक पुस्तके. 'रमाई', 'मी यशोधरा' इत्यादी कादंबऱ्या प्रकाशित. 'स्वप्नसंहिता' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा 'कवी कुसुमाग्रज पुरस्कार' इत्यादी अनेक पुरस्कारांनी सन्मानित. 
कवीला भोवतालच्या जगात विषमतांचे जाळे आढळते. एकीकडे पैशाची श्रीमंती आणि दुसरीकडे मनाचा कंगालपणा, तोंडात मूल्ये आणि वागण्यात संधिसाधुपणा, अंधारनिष्ठ आयुष्य आणि उजेडाचे मुखवटे अशा अंतर्विरोधांनी कवीच्या जीवाचा भडका उडतो. या प्रश्नांच्या गर्दीत जगण्याचा आधार मिळण्यासाठी कवी 'शब्दांचा आधार घेतात. त्यांची कविता सर्व दिशांनी झेपावणाऱ्या नकारांशी भांडणारी ठरते. कवी म्हणून जगलेले, भोगलेले त्यांच्या कवितेतून प्रकटते.

स्वाध्याय 

१) कृती करा.


कवीच्या जीवनातील 'शब्दांची भूमिका
उत्तर : 
(१) माउलीप्रमाणे कवीला पोटाशी धरले.
(२) कवीच्या तापदायक गोष्टींवर सावली धरली.
(३) कवीचा तोल सांभाळला.
(४) मरणापासून कवीचा बचाव केला.

(२) योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.


(अ) बिकट संकटांना कवीने म्हटले
  • (१) पोटाशी घेणारे शब्द.
  • (२) निरुत्तर निखारे.
  • (३) धावून आलेले शब्द.
(आ) शब्दांचा उजेड म्हणजे

  • (१) शब्दांचे मार्गदर्शन.
  • (२) शब्दांची मदत.
  • (३) शब्दांचा हल्ला.
(इ) चिडून सांडणारे ऊन म्हणजे

  • (१) कठीण प्रसंग.
  • (२) झाडाची सावली.
  • (३) तापदायक प्रसंग.

(३) (अ) खालील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.


(१) 'दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.'
उत्तर:  
दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या माणसाला कुणाचातरी आश्वासक उजेडाचा आधार लागतो. म्हणून कवी म्हणतात की, जेव्हा जेव्हा दिवसाढवळ्या अंधार दाटून आला, तेव्हा शब्दांनीच हातात वीज दिली म्हणजे जगण्याचा आधार दिला.

(२) 'मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला.'
उत्तर:
(२) आत्यंतिक दु:खाच्या वेदना सहन करताना माणसाला मरण पत्करावे लागते. कवी म्हणतात, जेव्हा जेव्हा माझ्या मनात मरणाचा विचार आला. मरण जवळ करावे, या विचाराच्या धारेत (प्रवाहात) अडकलो, तेव्हा शब्दांनीच या गर्तेतून मला बाहेर काढले. जणू तुफानात घेरलेल्या मला किनारा दाखवला; बुडताना वाचवले.

(आ) सूचनेप्रमाणे सोडवा.


(अ) 'आश्रय' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर: आश्रय- निवारा नसताना कवीला शब्दांनी काय दिले?

(आ) 'शब्द' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तर:  शब्द कवीचा तोल कुणी सावरला?

(इ) शब्दांनी मला खूप दिले; पण मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही किंबहना शब्दांच्या उपकाराची फेड करू शकत नाही', या अर्थाच्या ओळी शोधून लिहा.
उत्तर:
(१) मी भिकारी : मी शब्दांना काय देऊ?
(२) मी कर्जदार :शब्दांचा कसा उतराई होऊ?


(काव्यसौंदर्य)

(अ) एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला...' या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्वभाषेत लिहा.
उत्तर : 'शब्द' या कवितेत कवी यशवंत मनोहर यांनी त्यांच्या अंधारमय जीवनात शब्दांनी कसा दिलासा दिला व त्यांचे जीवन सावरले, यांचे हृदय शब्दांत वर्णन केले आहे.
ते म्हणतात - शब्दांनी माझ्या जीवनातला आकांत शमवला. माझ्यावर मातेसारखी ममता केली. जेव्हा जेव्हा मी दुःखाच्या अंधारात गाडला गेलो, तेव्हा तेव्हा शब्दांनी मला प्रकाश दाखवला. गतकाळातली एखादी आठवण वैऱ्यासारखी छळत राहते व जीव अस्वस्थ करते. त्या आठवणीच्या आगीत जिवाची लाही लाही होते. त्या आठवणीची धग नकोशी वाटते. अशी एखादी आठवण जेव्हा आगीसारखी माझ्या अंगावर धावत आली, तेव्हा त्या होरपळणाऱ्या आगीचा हल्ला शब्दांनी स्वत: झेलला. मला त्यातून सुखरूप बाहेर काढले. हल्ल्यावर प्रतिहल्ला करण्याचे सामर्थ्य मला शब्दांनीच बहाल केले.
'आठवणींची आग' या प्रतिमेतून आठवणीची दाहकता प्रकर्षाने जाणवते. 'हल्ला' या शब्दातून आवेग जाणवतो. या ओळीतून कवीने दु:खाची तीव्रता व शब्दाची शक्ती प्रत्ययकारीरीत्या मांडली आहे.

(आ) 'मी शब्दांत शिरलो आणि स्वतःला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.' या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर : कवी यशवंत मनोहर यांनी 'शब्द' या कवितेमध्ये शब्दाला त्याच्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे आणि स्वतः आपण शब्दांच्या आश्रयाला का आलो, याचे विवेचन आर्त व भावपूर्ण शब्दांत मांडले आहे. त्याच वेळी 'साहित्य हे जीवनाला आधारभूत ठरते,' हा ठोस विचारही मांडला आहे.
कवी म्हणतात- शब्दांनी मला आयुष्यभर सावरले. जगण्याची उमेद दिली. आईच्या ममतेने आधार दिला. मी भिकारी आहे, मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही. मी कर्जबाजारी आहे, मी शब्दांचे ऋण कधीच फेडू शकत नाही. माझ्या अंधारमय आयुष्यात मी कैक वेळा शब्दांच्या कुशीत शिरलो. स्वत:चा बचाव केला. दुःखाचे विष मी प्यायलो, पण ते पचवले शब्दांनी ! मी शब्दांविषयी कृतज्ञ आहे.
'विष मी प्यालो नि शब्दांनी पचविले' या विधानातून कवींची शब्दांबद्दलची कृतार्थता व्यक्त होते. 'शब्द आमुच्या जिवाचे जीवन !' ही संत तुकारामांच्या उक्तीची आठवण व्हावी, असे सामर्थ्य या ओळीत आहे. आणि जीवनातील विष पचवण्याचे सामर्थ्य कमवायला हवे हा दृढ विचार व्यक्त झाला आहे.

(अभिव्यक्ती)


(अ) आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत, ते लिहा.
उत्तर : 'शब्द' या कवितेमध्ये कवी यशवंत मनोहर यांनी वाट्याला आलेल्या आपल्या खडतर व समस्याप्रधान आयुष्यात शब्दांनी कसे सावरले व उमेदीत आयुष्य जगण्याचा कसा धीर दिला, याचे हृदयद्रावक वर्णन केले आहे. त्यांच्या आयुष्यात अनेक नकार वाट्याला आले. आयुष्यात आलेल्या बिकट संकटांना त्याने निरुत्तर निखारे असे म्हटले आहे. जीवनात न सापडलेल्या योग्य दिशेला, त्यांनी डोळ्यांसमोर आलेला अंधार म्हटले आहे. गतकाळातील कटु आठवण त्यांना आगीसारखी होरपळून टाकणारी वाटते. आयुष्यातील तापदायक प्रसंगांना ते चटके देणारे ऊन म्हणतात. असे जगू न देणारे नकार त्यांना मरणाच्या प्रवाहात ढकलतात. स्वत:च्या अस्तित्वाचीच त्यांना भीती वाटू लागते. अशा प्रकारच्या भयकारी नकार आणि बिकट दुःखदायी आयुष्यात
कवीला फक्त साहित्याचा आधार वाटतो.

(आ) 'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य,' हे विधान स्पष्ट करा.
उत्तर : कवी यशवंत मनोहर यांनी 'शब्द' या कवितेत दुःखाने भरलेल्या आयुष्यात शब्दांची समर्थ साथ आवश्यक असल्याचा ठाम विचार मांडला आहे. संघर्षमय व खडतर आयुष्यात शब्दच धीर देतात व जगण्याची उमेद वाढवतात, असा संदेश त्यांनी दिला आहे.
कवींच्या दुःखद आक्रोशाच्या हाकेला शब्द तत्परतेने धावून आले. कवींच्या बिकट संकटांच्या वेळी शब्दांनी आईच्या ममतेने पोटाशी घेतले. आगपाखड करणारी आठवणीची आग जेव्हा तुटून पडली, तेव्हा शब्दांनी तो हल्ला झेलला. तापदायक प्रसंगात शब्दांनीच त्यांच्यावर सावली धरली. दुःखाचा दाट अंधार भेदण्यासाठी कवींच्या हातात शब्दांनी लखलखीत वीज दिली. खडतर आयुष्याचा तोल शब्दांनीच सावरला. मरणप्राय यातनांच्या प्रवाहातून शब्दांनी किनाऱ्याशी नेले. जेव्हा स्वत:वरचा व जगण्यावरचा कवींचा विश्वास उडाला, तेव्हा शब्दांनी पाठीवर हात ठेवून धीर दिला. निराधार भटकत असताना शब्दांनीच त्यांना आश्रय दिला. कवींच्या आयुष्यातील कठोर प्रसंगांचे विष स्वत: शब्दांनी पचवले.
अशा प्रकारे जीवनातील प्रत्येक जीवघेण्या वळणावर कवींना शब्दांनीच सावरले. म्हणून शब्द म्हणजेच कवींचे जीवन जगण्याचे सामर्थ्य होते.

 (इ) 'मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व' तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : इतिहास, भूगोल, भाषा व साहित्य यांतून संस्कृती जन्माला येते. संस्कृती जीवनधारणेची मूल्ये जोपासते. यांत भाषा म्हणजे शब्द यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
जन्माला आलेले मूल शब्द शिकत जाते व भाषेतून व्यक्तिमत्त्व संपन्न होते. म्हणून शब्द ही मानवजातीला लाभलेली अमूल्य देणगी आहे. शब्दांमधून माणूस आपले विचार, भावना व कल्पना मांडतो. शब्द हे विचारविनिमयाचे अनोखे साधन आहे. शब्द हा माणसाचा उबदार श्वास आहे. शब्दांनी जगातील वेगवेगळ्या संस्कृती एकमेकांशी जोडल्या आहेत. शब्दांतून माणुसकीचे जतन व संवर्धन होते. आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्याचे शब्द हे समर्थ साधन आहे. जनावरे व आपण यांतला भेद शब्दांमुळे कळतो. नराचा नारायण करण्याची अमोघ शक्ती शब्दांमध्ये आहे. साहित्य, शास्त्र, कला व विज्ञान यांचा मूलाधार शब्दच आहे. मानवी जीवनमूल्ये शब्दांमध्ये साठवलेली आहेत. शब्द हे एकाच वेळी शस्त्र व शास्त्रही आहे. परंपरा आणि नवता या शब्दांमधून पिढीला आकळतात. असा हा अनन्यसाधारण शब्द मानवी जीवनाचे 'जीवन आहे.

(६) 'शब्द' या कवितेचे रसग्रहण करा.
उत्तर : अतिशय खडतर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शब्दांची साथ होती, शब्दांनीच माझ्या आयुष्याचा डळमळता डोलारा सांभाळला असा आशय व्यक्त करणारी कवी यशवंत मनोहर यांची 'शब्द' ही कविता आपल्याला शब्दांच्या संगतीने सकारात्मक व समृद्ध जीवन जगण्याची प्रेरणा देते. विषमतेने अंकित झालेल्या मूल्यव्यवस्थेमध्ये जिवाची काहिली करत जगताना शब्दांनी नकारांशी सामना करण्याची जिद्द दिली, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. जगण्याला सकारात्मक दिशा देण्याचे सामर्थ्य शब्दांमध्ये व पर्यायाने साहित्यात असते, हा अनमोल संदेश देणारी ही कविता आहे.
पदोपदी जगण्याचे बळ देणारे शब्द किती मौल्यवान आहेत, ही जाणीव स्वानुभवातून कवींनी आत्मीय व भावपूर्ण शब्दांमध्ये साकारली आहे. त्यांच्या या सुबोध पण काळजाला भिडणाऱ्या शब्दशैलीतून कवितेचा आशय सघन झाला आहे. शब्दांचे अपूर्व सामर्थ्य विशद करताना त्यांनी अनेक हृदय प्रतिमा वापरलेल्या आहेत. 'निरुत्तर निखारे, शब्दांचा उजेड, आठवणींची आग, चिडके ऊन, शब्दांची बिजली, शब्दांनी दिलेला किनारा,' अशा अनोख्या पण आशयघन प्रतिमातून कवितेचा भावार्थ दुग्गोचर होतो.
चार-चार ओळींचा सैल यमकप्रमाध पदबंध असलेली ही कविता थट विधानात्मक असल्यामुळे रसिकांच्या काळजाचा ठाव घेते. प्रासादिक असलेली शब्दकळा विचारगर्भतेला पूरक ठरली आहे. ठोस व दृढ जीवनाशय देणारी 'शब्द' ही कविता मला अत्यंत आवडली.